देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनाग् ।
बुधभूषण, मूळ श्लोक
भक्तविघ्नहनने धृतर(य)त्नं, तं नमामि भवबालकरत्नम् ।।१।।
भक्तसंकटे दूर कराया, सत्वर जो कृतीशिल
मराठी पद्यानुवाद
मत्त हत्तीही वठणी वरती लिलया जो आणील
स्तवन जयाचे करुनी होती, देव दैत्य धन्य
वंदन करीतो आम्ही प्रथम तो बालगणेशरत्न ।।१।।
सरल अर्थः- देवदानव ज्याची स्तुती करण्यात सहभागी होतात, कोणतेही सायास न करता सहजपणे मदोन्मत्त हत्तींवर जो विजय मिळवितो, भक्तांवरील संकटे दुर करण्यासाठी ज्याने प्रयत्न केले आहेत, त्या शिवाच्या बालकरुपी रत्नाला मी नमस्कार करतो.
श्री गणेशाला वंदन करुन कुठल्याही शुभ कार्याची सुरवात करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. बुधभूषण या आपल्या राजनिती वरील ग्रंथाच्या सुरवातीलाच श्री गणेशाचे स्तवन करुन आपल्या प्राचीन परंपरेचे युवराज संभाजी महाराजांनी अनुकरण केले आहे. या ग्रंथात गणेशाला वंदन करणारे आणखीही काही श्लोक संभाजी महाराजांनी लिहीलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देखील कोणत्याही कार्यारंभी श्रीगणेशाचेच प्रथम पुजन करतात. यात काहीच नवल वाटण्याचे कारण नाही. पुण्यात आपल्या समाज धारणेच्या, स्वराज्य उभारणीच्या कार्याची सुरवात शिवरायांनी आपल्या आईच्या मार्गदर्शना खाली केलेली होती. गाढवाचा नांगर फिरवुन, लोखंडी पार ठोकुन त्यावर तुटकी व्हान टांगुन पुण्याची बरबादी सुलतानी काळात केलेली होती. या नंतर पुणे ओस पडले होते. लोक पुण्यात वस्ती करायला भीत होते. सुलतानी निर्बंधाचा धाक, वन्य श्वापदांची भिती या सोबतच गाढवाचा नांगर फिरवुन, पार ठोकुन त्यावर तुटकी व्हान टांगुन घातलेली भीती ही देखील त्यावेळच्या सश्रद्ध मनाला दचकविणारी होती. त्यामुळे पुण्यात आता वस्ती करणे धोक्याचे आहे. तेथे आता पुन्हा मानवी उभी रहाणार नाही अशी एक भितीच ग्रामीण जनतेच्या मनात बसली होती. यावर काही धार्मिक तोडगा काढणे आवश्यक होते. त्यातुनच सोन्याच्या नांगराने भुमी नांगरणे व कसबा गणपती स्थापना करणे या गोष्टी निगडीत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहीजे.
मालवण येथील सिंदुदुर्ग किल्याच्या उभारणी पुर्वी देखील शिवरायांनी मोरयाच्या धोंड्यापाशी गणेश प्रतिमा तयार करुन श्री गणेशाचे त्यांनी पुजन केलेले होते. या घटनेचे स्पष्ट संदर्भ उपलब्ध आहेत. म्हणजेच अनेक किल्यांच्या उभारणी आधी शिवरायांनी गणेश पुजन केलेले असणार यात शंका नाही. हे सर्व आता सांगण्याचे कारण म्हणजे हिंदुसमाजात जातीय कलह निर्माण व्हावा या उद्देशाने ब्रिगेडी मानसिकतेचा सुरु असलेला अपप्रचार समाजाच्या लक्षात यावा. ‘’गणेश हा ब्राह्मणांचा देव असुन त्याची उपासना पेशवाईत सुरु झाली. त्या आधी ती फारसी प्रचलीत नव्हती.’’ हा चुकीचा समज आहे ही खुणगाठ आपण पक्की मनाशी बांधली पाहीजे व या अपप्रचाराला वेळीच पायबंद घातला पाहीजे. अनेक किल्यांवर गणपतीची मंदिरे आहेत. ती सर्वच पेशवेकाळात उभारलेली आहेत हा तर्क चुकीचा आहे. गणपती उपासना शिवपुर्वकाळापासुनच महाराष्ट्रात प्रचलीत असुन उगाच समाजात फुट पाडणार्या प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहीलेल्या ग्रंथाची सुरवात वरील श्लोक लिहुन केली आहे हे यामुळेच महत्वाचे आहे.
रणजित हिरलेकर